Thursday, 29 September 2016 0 comments

जे सिद्ध तेच प्रसिद्ध

                         जे सिद्ध ते प्रसिद्ध 

या भूतलावर प्रत्येक सजीव प्राणी हा आपल्या अस्तित्वासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत असतो. परंतु बदलत्या काळानुसार आता अस्तित्वाच्या व्याख्याही बदलत चालल्या आहेत. सुपरफास्ट युगात स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा डायरेक्ट प्रसिद्धी कशी मिळेल याकडे ज्याचा त्याचा काळ असलेला आपणास पाहावयास मिळतो. परंतु स्वतःला प्रसिद्ध करण्याच्या या आगळ्यावेगळ्या  स्पर्धेत कौशल्य, कल्पना, महत्वाकांक्षा, वैविध्य आणि कठोर मेहनती सारख्या गुणांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. 
आतापर्यंत फक्त राजकारणी, अभिनेते,उद्योगपती आणि  मोठी मंडळी यांचा प्रसिद्धीसाठी चाललेला खटाटोप सर्वश्रुत होता परंतु आता यात सर्वसामान्यही मागे नाहीत. आजकाल तर प्रत्येकाने  आपल्यातील कलाकौशल्याना बगल देऊन 'हम किसीसे काम नही' असाच पवित्र घेतलाय.  जबाबदारीचे भान न ठेवता फेसबुक, व्हॉट्सअप आणि फ्लेक्स  वर स्वतःचा जयजयकार करून घेण्यातच धन्यता मानली जात आहे.  
यातही गमतीशीर भाग म्हणजे कर्तृत्वाने प्रसिद्ध झालेल्या माणसांकडे जग धावत येते परंतु आजकाल  कर्तृत्वशून्य माणसांना  स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जगाकडे धावून स्वतःची ओळख द्यावी लागते. 
आयुष्याला जास्त लाइट घेण्यात काहीही अर्थ नाही आपल्यातील वेगळेपण आणि आपल्यातील अगाध सामर्थ्यच आपल्याला प्रसिद्ध करू शकते. अगदी आपण शून्य असलो तरी चालेल परंतु त्या शून्याला योग्य किंमत मिळवून देण्याची क्षमता फक्त आणि फक्त आपल्यातच असते. जोपर्यंत आपल्यातील कौशल्याने आपली लायकी सिद्ध करून आपण प्रसिद्धीसाठी लायक बनत नाही तोपर्यंत नायक म्हणून मिरवण्याला काहीही अर्थ नाही. 
एक डझनभर फ्लॉप चित्रपट देऊनही स्वतःला सिद्ध करण्याचा ध्यास मनावर घेतल्यानेच आज अमिताभ बच्चन भारतीय चित्रपट सृष्टीचा महानायक म्हणून प्रसिद्ध आहे. जर अमिताभने अपयशाला कंटाळून स्वतःला सिद्ध न करता सिनेमांतून काढता पाय घेतला असता तर कदाचित आज तो जगभर इतका प्रसिद्ध झाला नसता. एक चांगला धडाडीचा फटकेबाज म्हणून क्रिकेटमध्ये प्रवेश करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने जेव्हा कर्णधार म्हणूनही स्वतःला सिद्ध केले तेव्हाच तो जगभरात एक आदर्श कर्णधार म्हणून प्रसिद्ध झाला. 
समाजात ताठ मानेनें आणि सन्मानाने जगण्यासाठी कर्तृत्वालाच प्राधान्य द्यावे लागते. नाहीतर केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नसत्या उठाठेवी केल्यास त्यातील नकलीपणा व भंपकपणाचा फुगा एक ना एक दिवस फुटतंच असतो.
चला तर मग आपल्या आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेऊन त्यांच्या संस्कारांना आदर्श मानून    स्वतःला सिद्ध करा.  मग बघा उद्या आपल्यातील सर्वसामान्य एक असामान्य होऊन जाईल आणि जग आपोआप तुमच्यामागे धावेल. 

Tuesday, 20 September 2016 0 comments

संतापाने मनस्ताप


 संतापाने मनस्ताप

आता माझी सटकली
मला राग येतोय ......
एक चित्रपटातलं हे गाणं अतिशय लोकप्रिय ठरले याचं कारण बरेचदा आपल्या स्वभावातील पैलू आपल्याला एखाद्या गीतातून व्यक्त करता आले की आपण ते नेहमीच गुणगुणतो. राग, क्रोध, संताप किंवा तिडिक या एकाच अर्थाच्या परंतु क्षणात अनर्थ करणाऱ्या गोष्टी मानवी जीवनात मोठ्या प्रमाणात घट्ट रुजलेल्या आपणास पाहावयास मिळतात. राग ही भावना असून ती नैसर्गिक आहे परंतु या भावनेला आवर घालता येणे तसेच त्यावर विजय मिळवता येणे तितकेच गरजेचे आहे. हिंसेला खतपाणी घालणाऱ्या रागावर आपल्याला यावर घालता न आल्यास त्यातून कधीही भरून न निघणारी हानी उत्पन्न होऊ शकते.
नको रे मना क्रोध हा खेदकारी
हे मनाचे श्लोक आपण शाळेत ज्या भावनेने म्हणतो ती भावना प्रत्यक्षात राग आल्यावर  लुप्त होते  कारण मनाचे श्लोक ओठात आणि राग मनात धरण्याचा दुर्गुण आपल्या अंगी भिनलेला असतो.
आयुष्यात आलेल्या रागावर जर आपल्याला नियंत्रण करता आले नाही तर आपल्या प्रगतीला आणि प्रतिमेला निश्चितपणे मर्यादा निर्माण होतात. ओवीपेक्षा शिवीला अधिक महत्व दिले गेल्यामुळे संयमाची, समंजसपणाची व्यापकता आपोआपच लोप पावत चालली आहे.
एकदा एक गृहस्थ एक विद्वानांकडे गेले आणि सांगू लागले की, महाराज मला राग खूप येतो आणि तो राग लवकर आटोक्यात आणता येत नाही, त्यावर तुम्ही मला काहीतरी उपाय सांगा? त्यावर गुरुजींनी त्याला मनावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक सल्ला दिला. गुरुजींनी त्याच्या हाती एक बर्फाचा गोळा दिला आणि विचारले तुला कसे वाटले? तो गृहस्थ म्हणाला " अतिशय थंड आणि मनाला आल्हाददायक वाटले. आता गुरुजींनी त्याचा हात हातात घेतला आणि बर्फ घेतलेली त्याची मूठ बराचवेळ तशीच दाबून धरली. आता मात्र तो माणूस मोठ्याने ओरडायला लागला आणि गुरुजींना विनवण्या करू लागला. गुरुजींनी त्याचा हात सोडला तेव्हा त्याचा हात लालबुंद आणि बधिर झाला होता. आता गुरुजी बोलू लागले " राग हा नैसर्गिक असतो अगदी  या बर्फासारखा, थोडा वेळ येऊन गेला तर थंडावा देतो मात्र अधिक वेळ त्यालाच धरून बसल्यास मात्र इजा होण्याचा धोका संभवतो.
आपल्या आयुष्यातही बरेचदा असंच होतं रागरूपी बर्फ भावना व्यक्त कारण्यापुररता तात्पुरता हाती न घेतल्यामुळे  आपल्यालाच त्यातून नुकसान होत असते.
ऑफिसमध्ये  वरिष्ठांवर राग व्यक्त करू न शकल्याने बॉस ज्युनिअरवर  रागवतात. आपण घरी जाऊन बॉसचा राग आपल्या कुटुंबियांवर काढतो. मग त्यातून विस्फोट होऊन घरादारात अशांती निर्माण होते. सकाळी एखाद्या किरकोळ गोष्टीवरून झालेली चिडचिड आणि राग आपल्या संपूर्ण दिवसाला निराशेच्या खाईत लोटत असतो.१४ मिनिटांच्या रागाचे दुष्परिणाम १४ वर्षापर्यंतच्या कारावासात कसे घालवावे लागतात यावर काही दिवसांपूर्वी येऊन गेलेला बाबांची शाळा नामक चित्रपट  बराच काही शिकवून जातो.
म्हणूनच आपल्या रागाला वेळीच वाट मोकळी करून द्यावी व त्याचा पूर्णपणे निचरा करावा नाहीतर त्याचे दूरगामी दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात.  विपश्यना, ध्यान, योगा, प्राणायाम आणि मानसिक नियंत्रण अशा गोष्टींनी तयार केलेलं मन रागावर चांगल्याप्रकारे नियंत्रण करू शकते.

थोडक्यात रागाचा उगम त्याची कक्षा  याचा शोध आणि बोध  आपणच आपापल्यापरीने घेतला पाहिजे.  सकारात्मक विचार आणि संयम याच्या  साहाय्याने रागाने आपला ताबा घेण्यापूर्वीच आपण रागावर ताबा मिळवल्यास आपल्यासारखे सुखी आपणच असू.

सागर नवनाथ ननावरे 
पुणे 
Saturday, 10 September 2016 0 comments

संस्कारांच्या जगात

संस्कारांच्या जगात 

कालपरवा असाच रस्त्यावरून भाजी घेऊन घराच्या दिशेने निघालो होतो. समोरून दोन जेष्ठ नागरिक रस्ता ओलांडत होते तेवढ्यात समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोराचा कट मारला त्यातील एक गृहस्थ धक्क्याने जागीच कोसळले. आजूबाजूला असणाऱ्या आम्ही ठराविक लोकांनी त्यांना अलगद उचलून जागी उभे केले फारसे काही लागले नव्हते परंतु थोडेसे खरचटले होते. आम्ही त्यांना सावरतच  होतो तेवढ्यात तो तरुण गाडी वळवून त्या गृहस्थांच्या दिशेने आला आणि उर्मटपणे बोलू लागला. त्या तरुणाच्या मागे बसलेली तरुणीही  मोठ्या अरेरावीने त्या दोघं गृहस्थांना बोलू लागली. न राहवून ते बाबा बोलून गेले," अरे आमचं वय झालंय तुम्ही तर धडधाकट आहेत ना? आई बाबांनी हेच संस्कार शिकवलेत का ? असे म्हणता क्षणीच त्या तरुणाचा पार चढला आणि तो बाबांच्या दिशेने रागात धावत आला. आजूबाजूच्या बघ्यांनी त्या दोघांना कसेबसे आवरले परंतु  दोघेही तरुण तरुणी असभ्य भाषेत  त्या गृहस्थांना शिवीगाळ करतच होते. 

काही वेळाने आमच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात आली आणि ते दोघे गृहस्थ आपल्या वाटेने आणि हे दोघे राजाराणी एकमेकांना बिलगून भरधाव वेगाने बाईक वर बसून निघून गेले.

या साऱ्या प्रकाराने मी मात्र कमालीचा अस्वस्थ झालो मनात विचारांनी थैमान घातले. हेच का आजचे संस्कार ? पडलेल्या व्यक्तीला उठवायचे सोडून त्याच्याच अंगावर धावून जायचे हीच का शिकवण? मोठया मेहनतीने आणि जिद्दीने आईबाबा मुलांना शिकवतात ते याच परतफेडीसाठी का?

आणि याच जागी त्यांच्या घरातील कोणी वयोवृद्ध असते तर ?

आपल्या संस्कारांवरच देशाचे भवितव्य उज्वल होणार आहे याची आजच्या बिघडलेल्या तरुणाईला जाणीव होण्याची गरज आहे. आपले संस्कार हे आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करीत असतात आणि त्यातूनच आपली प्रगती होत असते. चांगल्या  संस्कारमय पिढ्या घडल्या तरच  संस्कारांमुळे आपली संस्कृती टिकून राहणार आहे. युवाशक्तीला चांगल्या शिक्षणाबरोबरच संस्काराचीही जोड मिळाल्यास हीच युवाशक्ती देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवू शकते.

रयतेचे स्वराज्य निर्माण झाले ते शिवबांच्या पराक्रमामुळे आणि त्यांच्यावर असणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या संस्कारांमुळेच. आणि ज्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा संपन्न वारसा लाभला त्या मातीत राहून जर आपण त्या संस्कारांची जपणूक नाही केली तर काय उपयोग होणार?

चांगले विचार,चांगल्या सवयी, सामाजिक बांधिलकीची जाणीव, जेष्ठा वरिष्ठांचा आदर आणि जबाबदारीचे भान  यासारख्या संस्करांनीच आपले भविष्य सुजलाम सुफलाम होणार आहे.  

चला तर मग एक चांगला माणूस आणि एक जबाबदार नागरिक म्हणून चांगल्या संस्कारांनी आपल्या व्यक्तिमत्वाला अर्थपूर्ण आकार देऊया. 

Monday, 5 September 2016 0 comments

गणेशोत्सवाच्या आणि शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

   गणेशोत्सवाच्या आणि शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

 
;