Monday, 29 February 2016 0 comments

जागतिक महीला दिन विशेष मराठीत

८ मार्च ला 'जागतिक महिला दिन' महिलांच्या आर्थिक,राजकीय,सामाजिक क्षेत्रातील योगदानाचे प्रतीक म्हणून जगभरात साजरा केला जातो हा दिन सुरु करण्यामागचा उद्देश काहीही असला तरी यावर लिहायला घेतले कि  एक विचार मनात जरुर येतो कि ,'पुरुषांच्या बरोबरीने आकाशाला गवसणी घालणारी स्त्री कि पुरुषी अहंभावापुढे अंधारात लोटलेली स्त्री’.
मुलगी जन्मा यावी शेजारच्या घरात
कुलदीपक मात्र हवा स्वतः च्याच दारात
 कारण मुलीचा जन्म म्हणजे हुंड्याचा त्रास?
 मुलीचा जन्म म्हणजे परक्या घराच्या सेवेसाठी आपला घास?आणि
  मुलीचा जन्म म्हणजे पळून जाऊन लग्न केलं तर इज्जतीचा ह्रास !
काळ बदलतोय प्रगतीचे वारे अवकाशाच्या उंचीलाही ठेंगणे ठरवत चालले आहे आणि अशातही माणूस नावाच्या प्राण्याच्या विचाराची वाढ दिवसेंदिवस खुंटतच चाललीय. ईश्वराचीही स्त्री रूपात पूजा करणाऱ्या संस्कृतीचे वारस म्हणवणारे स्वतःच्या मुलीत ईश्वर का शोधत नाहीत?
यत्र नार्यस्तु पुज्यन्ते, रमन्ते तत्र देवता !!
या संस्कृतातील वचनाचा अर्थ असा आहे  कि, जिथे स्त्रियांना पूजले जाते त्यांचा आदर केला जातो तेथे देवाचा निवास असतो. आपल्या संस्कृतीत प्रत्येक स्त्री वा परस्त्री माते समान मानून तिला वंदिले पुजिले जाते. तर दुसरीकडे एका स्त्रीच्याच पोटी जन्म घेतलेले काही नराधम जे पुरुष प्रधान समाजाचा झेंडा मिरवतात आणि बलात्कार,हुंडा आणि अपमानास्पद वागणुकीने  जिच्यामुळे या जगात आलेत तिलाच कलंकित करतात. आजची स्त्री कितीही शिक्षित असली, स्वताच्या पायावर उभी असली तरीही ति सुरक्षित नाही हे खरच आपल दुदैव आहे. परंतु असे असतानाही निर्भीडपणे संकटांशी दोन हात करून आपल्या हक्कांसाठी लढणारी ही रणरागिणी आजही सक्षम आणि लढाऊ आहे ही अभिमानाची बाब आहे.
आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने यशाचे झेंडे रोवणाऱ्या त्या स्त्री शक्तीला गेल्या शतकभरात पुरुषांबरोबर कुठेही न्यायस्थान मिळाले नाही हे वास्तव नाकारता  येणार नाही!
पूर्वी चित्रपटांत अबलेची भूमिका साकारणारी स्त्री आज स्त्रीपटांत , गुडांना लोळवत या काळात रूपेरी पडदा गाजवत आहे. पूर्वी  नवऱ्याला उदंड आयुष्य लाभावं म्हणून  उपवास करणाऱ्या स्त्रिया आज नवर्याच्या बरोबरीने नोकरी व्यायसाय करून संसाराचा गाडा अभिमानाने चालवत आहे. चार भिंतीत  झिम्मा खेळणारी स्त्री  आज उंबरठा ओलांडून राष्ट्रकूल स्पर्धा, ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारांत  देशविदेशात देशाभिमान जागा करीत आहेत. पूर्वी डोक्यावरचा पदर सावरत आकाशाकडे पाहणारी स्त्री आज महिला वैमानिक होऊन संपूर्ण जगाला अवकाशातून स्वाभिमानाने न्याहाळत आहे.
आणि तरीही आम्ही पुरुषप्रधान नावाची आंधळी आणि बिनकामाची बिरुदावली मिरवतोय हि लज्जास्पद गोष्ट आहे.
स्त्री कधीच अबला नव्हती याला इतिहास साक्षी आहे राजमाता जिजाऊ,सावित्रीबाई फुले,मदर तेरेसा यांच्यापासून ते कविता राऊत, स्व. कल्पना चावला, स्व.नीरजा,डॉ किरण बेदी, डॉ मंदा आमटे, मा.राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील प्रत्येकीने एक नवी क्रांती घडवली आहे. ही स्त्री अमाप धैर्य बाळगणारी, लढाऊ वृत्ति अंगी असलेली, तरीही नम्र,सोज्वळ, सहनशील, शालीन, आणि प्रेमळ आहे. बांगड्यांचे वजन पेलणार्या नाजूक हातांनी वेळप्रसंगी हाती तलवार घेऊन इतिहासालाही आपली दखल घ्यायला लावली हिच ती खरी स्त्री शक्ती.

स्त्रीची प्रतिष्ठा फक्त पतिव्रता जपणारी पत्नी अथवा जबाबदार माता होण्यातच नाही, तर ,कणखर वीर स्त्री होण्यात आहे. आज  जगातील  असंख्य हिरकणींनी आयुष्याचा शिखराला जिद्द आणि संघर्षाने केव्हाच सर केले आहे. त्यांच्या या जिद्दीनेच कित्येक आयुष्य उभारली आहेत. त्यांच्या या दुर्दम्य अशावादातूनच  उदयाच्या आयुष्याची पहाट उगवणार आहे.
आज आई,बहिण,पत्नी अशा एक अनेक भूमिकांतून आपल्याला सावरणारी, आधार देणारी स्त्री हा समाजाचा कणा असून त्यावरच समाजाचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे केवळ महिलादिनाला तिचे महत्व जोपासण्यापेक्षा प्रत्येक दिवसाला तिच्यातील शक्तीचा आणि तिच्या कर्तुत्वाचा आदर आदर केल्याने नक्कीच समाज सशक्त होईल.   
या महिलादिनाच्या निमित्ताने तमाम स्त्री शक्तीला आणि तिच्या अगाध सामर्थ्याला सलाम….!

लेखक:
सागर नवनाथ ननावरे

Blog : http://sagarnanaware.blogspot.in/





Saturday, 27 February 2016 0 comments

मराठी राजभाषा दिन

माझ्या भावनांना,कल्पनांना आणि कर्तुत्वाला अर्थ  देणाऱ्या माझ्या मायमराठीला आज मराठी राजभाषा दिनानिमित्त स्वतःच्या शब्दात गौरवांजली...

अभिमान मराठीचा 

मराठी मातीत वाढलो आम्ही 
स्वराज्याच्या रणात लढलो आम्ही 
शिवबांचा दिमाख कधी पडणार नाय 
मराठीचा अभिमान आम्ही सोडणार नाय  

शूरांची भूमी अन वीरांचे कर्म
जगाला  सांगू मायमराठीचे मर्म 
कुसुमाग्रजांचा 'कणा' कधी मोडणार नाय 
मराठीचा अभिमान आम्ही सोडणार नाय  

आंबेडकरांची बुद्धी अन फुलेंचे कष्ट 
अन्याय आणि दैन्य इथे मुळापासून नष्ट 
भेदभावाचे पीक आता वाढणार नाय 
मराठीचा अभिमान आम्ही सोडणार नाय  

जगदंबेची कृपा आणि शिवरायांचे शौर्य 
बाळासाहेबांची हाक अन टिळकांचे चातुर्य 
संकटाच्या आघाताने आता रडणार नाय 
मराठीचा अभिमान आम्ही सोडणार नाय  

इंग्रजीचा स्वीकार अन मराठीचा सत्कार 
ज्ञानाच्या अमृताने बरे करू अज्ञानाचे विकार 
शिक्षणाच्या शस्त्राने आता लढणार हाय 
मराठीचा अभिमान आम्ही सोडणार नाय 

सागर नवनाथ ननावरे   

Monday, 8 February 2016 0 comments

बोलणार तोच चालणार

काल परवा  एक मित्र भेटला 
'एक युवा राजकीय नेता'राजकीय वारसा पैसा  आणि दांडगा
 जनसंपर्क असणारा.बर्याच 
दिवसांनी भेटल्यामुळे आमच्या गप्पा रंगल्या. तो सांगू लागला कि नुकत्याच
 झालेल्या पक्षांतर्गत नियुक्तीतून त्याला डावलण्यात आलं त्यामुळे
 थोडासा नाराजही दिसत होता . मी  त्याला विचारलं " भरपूर पैसापानी आहे, मोठा  मित्रपरिवार आहे मग असं कायघडलं कि तुझ्यावर  हि वेळ  आली ?"

तो सांगू लागला पक्षाने  आयोजित केलेल्या कार्यक्रमातकेवळ प्रभावी  भाषण न करता आल्याने कालपरवाच्या नवीन मुलावर जबाबदारी  सोपविण्यात आली.

मनात विचारचक्र सुरु झाले  नेतृत्व आणि कर्तुत्व असतानाही केवळ वक्तृत्व नसल्याने  अनेकदा राजकीय समीकरणे  वेगाने उलट दिशेने धावतात.  सध्याच्या युगात चर्चेचा आणि जिव्हाळ्याचा  असणारा राजकीय विजयरथ फक्त वक्तृत्वकला नसल्याने  जागीच थांबतो. 
राजकारणात ज्यांची भाषणे  प्रभावी असतात असेच लोक लोकांना आपल्याकडे आकर्षित करू शकतात.
असं म्हणतात बोलणार्या  दहा हजारांत एकच वक्ताअसतो आणि हा वक्ताच खर्या अर्थाने चांगला नेता बनतो.  एखाद्या व्यक्तीला राजकारणात यशस्वी व्हायचेअसेल तर  त्याला प्रभावी भाषण करता येणे हे अपरिहार्य आहे. आणि त्यातही इतिहासाचा विचार केला  तर याभाषणकलेने अनेकांना शून्यातून यशोशिखरापर्यंत पोहोचविले आहे. यात  स्व. आचार्य अत्रे,दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख,प्रमोदजी  
महाजन, गोपीनाथरावजी मुंडे आणि महाराष्ट्राची तोफ  बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे सध्याचे पंतप्रधान  नरेंद्र मोदिजी आदी मंडळींनी भाषणकलेनेच तमाम जनमानसावर राज्य केले.

खरं  तर बोलणे हि माणसाची 
सहजप्रवृत्ती असून याच्या जोरावर वेळोवेळी मानवाने  आपले अस्तित्व आणि वर्चस्व सिध्द केले आहे. केवळ  आपल्या प्रभावी बोलण्याने समोरच्या व्यक्तीच्या मनावर  गारुड घालणे हि  उत्तम वक्तृत्वाचीच देणगी आहे.

महाराष्ट्र हे ज्याप्रमाणे कलेचे  आणि कलाकारांचे राज्यआहे त्याचप्रमाणे हे उत्तमोत्तम  वक्त्यांचे जणू माहेरघरचआहे. या महाराष्ट्राच्या मातीने अनेक सुप्रसिध् वक्ते घडविले आणि या वक्त्यांनीच आपल्या प्रभावी वक्तृत्वाने संपूर्ण देशाला आपली दाखल  घेण्यास भाग पाडले.
महाराष्ट्रात राजकीय वकृत्त्वाचे उच्च दर्जाचे  मापदंड आहेत ही आपल्या सर्वांसाठी  अभिमानाची गोष्ट आहे.
सध्याच्या तरुणांत नेतृत्वगुण  दिसून येतो परंतु जर त्याला प्रभावी वक्तृत्वाची जोड मिळाली तर राज्याच्या राजकीय आसमंतावर तेजस्वी तारे उदयास vयेतील.
एक चांगला 'नेता' बनण्याचा  मानस असणारे पण बरेचजण केवळ भाषणकला न जमल्यामुळे शेवटपर्यंत"कार्यकर्ता"च बनून vराहतात.
भाषणाबद्दल वाटणारी  अनावश्यक भीती, नकारात्मक दृष्टीकोन आणि  आत्मविश्वासाचा अभाव या  साऱ्या  गोष्टीच चांगल्या नेतृत्वाला  सतत मागे ठेवतात.
कोणताही राजकीय वारसा  नसणारे अनेक जण केवळ आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर  आपला ठसा उमटवताना दिसतात. तर दुसरीकडे प्रचंड  इच्छाशक्ती,दांडगा जनसंपर्क  आणि शक्तिशाली  राजकीय वारसा असूनदेखील  काही जण इतरांच्या जयजयकारातचआपली कारकीर्द संपवितात,हेच या भाषणकलेचे खरे सामर्थ्य होय.
आपल्याकडे इतरांपेक्षा  कितीही मौलिक विचार असले तरी केवळ भाषणरूपाने ते  मांडता न आल्याने त्या आपल्या विचारांना व्यक्त  होण्यासाठी इतरांच्या वक्तृत्वाचा आधार घ्यावा लागतो. कारण ज्ञान असण्यापेक्षा ते  दिसणं खूप महत्वाचं असतं  आणि हेच दाखविण्याचे प्रभावी साधन  म्हणजेच भाषणकला होय.
आजपर्यंत अनेक योद्ध्यांना  जगावर आपली पकड जमवता आली ती फक्त वक्तृत्व, नेतृत्व आणि  कर्तुत्वाच्याच   जोरावर. उत्तम वक्त्याचे महत्व या जगात फार पूर्वीपासून जोपासले गेले आहे. अनेक राजांनी आपल्या कणखर वाक्तृत्वानेच आपल्या  सैन्याला चेतविले आणि यशस्वी राज्यही केले.  अलेक्झांडर चे  सैन्यही जग जिंकण्यासाठी निघाले होते ते  फक्त त्याच्या प्रभावी आणि कुशल वक्तृत्वामुळेच!
राजकारणाच्या या भाऊगर्दीत आपल्याला जर "राजा"म्हणून  जगायचे असेल तर  भाषणकलेला पर्याय नाही.हजारो इच्छुक आणि शेकडो  उमेदवारांतून आपल्याला जर लाखो लोकांच्या मनावर  अधिराज्य गाजवायचेअसेल तर प्रभावी भाषण कला आत्मसात करणे हि काळाची गरज आहे. अन्यथा  आपल्यातील वक्तृत्वाचा'अभाव' हा  प्रतिस्पर्ध्यांचा 'प्रभाव'  वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतो.
म्हणूनच ज्याप्रमाणे समाजात 'जो शिकला तोच टिकला',त्याचप्रमाणे राजकारणात 'जो बोलणार तोच चालणार' असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.
आपली प्रतिष्ठा, आपला वेळ  आणि आपला पैसा हा भाषण  न जमल्यामुळे इतरांच्या पदरात पाडण्यापेक्षा आपणच  आपल्या यशाचे शिल्पकार ठरू  शकतो ते प्रभावी भाषण कलेनेच.
मित्रांनो जमाना प्रेझेन्टेशनचा  आहे घड्याळाच्या काट्यांमागे काळ धावतोय, बदलाच्या वार्याने फक्तसमाजालाच आणि  परिस्थितीलाच नाही तर राजकारणाला देखील विळखा घातला आहे. 
आणि म्हणूनच बदलत्या राजकीय  समीकरणांत आपलं नाणं ठणकावण्यासाठी 
भाषणकलेसारखी दुसरी संधी नाही.

इतरांच्या भाषणाला आपल्या  हाताचे टाळ बडविण्यापेक्षा आपल्या भाषणांसाठी टाळ्यांच्या कडकडाटाची स्वप्ने प्रत्यक्षात  आणणे केंव्हाही चांगलेच.


 
;