Sunday, 28 January 2018 0 comments

राष्ट्रभक्ती म्हणजे काय रे भाऊ ? सागर ननावरे

राष्ट्रभक्ती म्हणजे काय रे भाऊ ? सागर ननावरे 
राष्ट्रभक्ती म्हणजे काय रे भाऊ ?
भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन नुकताच देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. आपल्या देशाच्या संविधानाप्रती सन्मान आणि स्वाभिमान व्यक्त करण्याचा खरं तर हा दिवस. विविधतेत एकता असणाऱ्या या आपल्या देशात अनेक सण आनंदाने साजरे केले जातात. परंतु आनंदाने आणि अभिमानाने साजरा केला जाणारा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन यांचा अनुभव काही वेगळाच. 
लहान थोरांपासून सर्वांच्या उरात देशभक्तीची जाज्वल्य भावना दाटण्याचा हा दिवस. मला आठवतं शाळेत असताना पहाटे लवकर उठून. कडक इस्त्री केलेला पांढरा शुभ्र  गणवेश परिधान करायचो. बुटाला चकचकीत पॉलिश व्हायची. शर्टाच्या खिशाजवळ राष्ट्रध्वजाची प्रतिमा लावल्यावर कमालीची राष्ट्रभक्ती उफाळून यायची. कारण ती राष्ट्राची किंवा राष्ट्रध्वजाची प्रतिमा बाहेरून जरी खिशावर दिसत असली तरी आत हृदयाजवळ अभिमानाचा ऑरा आपोआप तयार व्हायचा. जसजसे शाळेजवळ जायचो तसतसे "ए मेरे वतन के लोगो" या लतादीदींच्या आवाजातील संगीताच्या ओळी कानावर पडायच्या. नंतर शिस्तीत प्रभात फेरीतून चालताना राष्ट्रभक्तीपर घोषणा देताना कमालीचा आनंद मिळायचा. राष्ट्रध्वजाला सलामी देताना काहीकाळ आपण स्वतः स्वातंत्र्यसैनिक झाल्याचा भास व्हायचा. पाहुण्यांचे मनोगत फारसे पचनी पडायचे नाही. कारण कार्यक्रमाच्या समारोपाला मिळणार खाऊ काय असेल याचाही विचार डोक्यात यायचा. कार्यक्रमाचा समारोप झाला की पावले वेगाने घराच्या दिशेने सरसवायची. 
कधी एकदाचे घरी पोहचतो आणि टीव्ही सुरु करतो असे व्हायचे. कारण त्यादिवशी दुपारी हमखास देशभक्तीपर चित्रपट पाहण्याची संधी मिळायची. एरव्ही टीव्ही पाहू नको म्हणणारे पालक त्यादिवशी मात्र चित्रपट पाहायला आमच्यासोबत बसायचे. 'क्रांतिवीर,क्रांती,चायना टाऊन,बॉर्डर,तिरंगा यासारखे देशभक्तीपर चित्रपट टीव्हीवर ठरलेले असायचे. पाहता पाहता तो आनंदाचा दिवस कधीच संपू नये असे वाटायचे. आणि पुन्हा सहा सात महिन्यांनी स्वातंत्र्यदिनी हा अनुभव अनुभवायला मिळणार या आशेवर दुसऱ्या दिवशी शाळेत हजर व्हायचो. सारे काही अविस्मरणीयच. प्रत्येकाचा अनुभव थोडाफार असाच असतो.
वर्षांमागे वर्षे सरतात बालपणाचा शिक्का पुसट होऊन मोठे झाल्याचा मोठेपणा फुटलेल्या मिसरुडांनी दिसून येऊ लागतो. कर्तव्ये,जबाबदाऱ्या आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली  एक आदर्श नागरिक एव्हाना दबून जातो. स्वतःच्या सुखासाठी धावताना देशाबद्दलची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या कृतीपेक्षा फक्त शब्दांतून दिसून येतात. स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिन म्हटले की उत्सुकता लागते. परंतु दुर्दैव म्हणजे ती उत्सुकता असते ती सुट्टीच्या औचित्याने फिरायला जाण्याची,पार्ट्या करण्याची आणि एंजॉय करण्याची. आणि मग मनाला प्रश्न पडतो की हाच का तो राष्ट्रभक्तीचा दिवस? देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दलचा हाच का तो आदराचा दिवस? 
पूर्वी टीव्हीवर प्रजासत्ताक दिनी ध्वज संचालनाच्या आणि राष्टभक्तिपर उपक्रमांच्या बातम्या झळकायच्या. पण आता सुट्टीमुळे गोव्यात पर्यटकांची गर्दी, कोकणात पर्यटकांचा माशांवर ताव" अशा ठळक बातम्या येतात. यापुढेही जाऊन याच दिवशी सेल्फी काढताना जीव गमावला' यासारख्या बातम्याही प्रसिद्ध होतात.
एकीकडे तो सैनिक सण वार, घर दार विसरून रात्रंदिवस आपल्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावतो. आणि दुसरीकडे आपण मात्र राष्ट्राभिमानाच्या दिनी एन्जॉय करण्यात समाधान मानतो. हाच का आपला आपल्या देशाप्रती असणारा आदर?
हे जर असेच चालू राहिले तर तर एक दिवस असा येईल की, राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी बोटावर मोजण्याइतके लोक उपस्थित असतील. हे आपल्याला थांबविले  पाहिजे. वर्षातले हे दोन दिवस आवर्जून आपल्या गावातील शाळांत किंवा शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी हजर राहिले पाहिजे. समुद्र किनाऱ्यावरची गर्दी ध्वजारोहण सोहळ्याच्या ठिकाणी दिसून आली पाहिजे. आपल्या पाल्यांसोबत अशा कार्यक्रमांना हजर राहून देशभक्तीचे धडे त्यांना देता आले पाहिजेत. 
पर्यावरण,स्वच्छता,भ्रष्टाचार,दहशतवाद आणि देशासमोर असणाऱ्या आव्हानांवर मात करून देश महासत्ता कसा होईल याचे संस्कार विद्यार्थीदशेत बालमनांवर रुजवता आले पाहिजेत.
केवळ दहशतवाद,सैनिक,शाहिद यांच्याबद्दल कट्ट्यावरच्या बाष्कळ गप्पा बंद झाल्या पाहिजेत. देशाचा जबाबदार नागरिक म्हणूनदेशाप्रती  असणारी बांधिलकी कृतीतून जपता आली पाहिजे. चला तर मग थोडा वेगळा विचार करूया ओठांवरची राष्ट्रभक्ती बोटांवर आणून बुलंद मुठी आकाशाकडे सरसावुया. मग बघा"सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा" म्हणताना एक आगळावेगळा अभिमान प्रत्येकाच्या मनामनांतून ओतप्रेत वाहिल्याशिवाय राहणार नाही. 

- सागर ननावरे 
Saturday, 20 January 2018 0 comments

शून्यातून शिखराकडे - सागर ननावरे


Monday, 15 January 2018 0 comments

मकर संक्रांती स्पेशल : कुछ मिठा हो जाये

 कुछ मीठा हो जाये...!
'डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवली तर सगळी कामे होतात' असं म्हटलं जातं.
मुळात क्रोध आणि अहंकार आपल्या स्वभावाच्या गणितातून वजा व्हावा हा त्यामागचा मूळ उद्देश. आणि हे गणित जमल्यास आयुष्याचं गणित बरोबर यायला वेळ लागत नाही हेही तितकंच खरं.
आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने डोक्यावर बर्फाच्या लाद्या आणि तोंडात साखरेची पोती घेऊन जो तो फिरताना नक्कीच दिसणार. "छोडो कल की बाते" असे म्हणत जुने वाद,वैर, हेवेदावे विसरून आज मनात जिव्हाळा पेरण्यासाठी जो तो सज्ज असणार. 
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणून प्रेमाचा हलवासुद्धा मनामनात नक्कीच शिजणार. कारण नात्यांत स्नेहाचा गोडवा वाढविणारा हा मकर संक्रांतीचा सण प्रत्येकासाठी आनंदाचा आणि उत्साहाचा असतो.
खरं तर हा गोडवा केवळ मुखातून न दिसता एकमेकांच्या सुखांतून दिसून यायला हवा. आज प्रत्येकजण भौतिक सुखांच्या मॅरेथॉन मध्ये जीव प्राण एक करून धावत आहे. प्रत्येकाला पुढे जायचे आहे. प्रत्येकाला पैसे,संपत्तीची आणि सुख हवे आहे. अपेक्षेइतके मिळवून सुद्धा जो तो इथे उपाशीच आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या स्वार्थासाठी जो तो धावतच आहे. धावताना आपल्या मागून पुढे कोणी जात असल्यास पाय आडवा टाकून एकमेकांना पाडण्याचा प्रयत्नही होत आहे. ही मॅरेथॉन जिंकण्यासाठी गोड गोड बोलून खोड मोडण्याचाही डाव तेजीत चालला आहे. आपला फायदा होण्यासाठी जिभेवर साखरेचा गोडवा आणणारे काम होताच साखर जशी विरघळून जाते तसे गायब होतात. राजकारण,सेल्स,समाजकारण,आणि अनेक क्षेत्रांत अशा गुडी गुडी टॉक करणाऱ्या मधमाशा डंख मारून मध घेऊन पसार होत आहेत. 
उदाहरण द्यायचेच झाल्यास अगदी संपत्तीचा ताबा मिळेपर्यंत आईबाबांना रोज गोड गोड खाऊ देणारे ताबा मिळाल्यावर मात्र खाण्यापिण्याचाही हिशोब काढतात. प्रत्येक नात्यांना याचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे सूर्य कोणत्या राशीत प्रवेश करतो काय आणि मकरसंक्रांत काय यांना याचे काहीही देणेघेणे नाही. 
मुळात निस्वार्थी प्रेमाची देवाणघेवाण होण्यापेक्षा इप्सित साध्य होण्यासाठी ओढून ताणून मुखावर गोडवा आणला जात आहे हेही तितकेच सत्य. " मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार" अशी गदिंच्या रचनेप्रमाणे सध्या परिस्थिती आहे. आपली कामे करून घ्यायची असतील ना तर गोड बोललेच पाहिजे असा ट्रेंड सर्रास पाहायला मिळतो. "कामापुरता मामा" बनून गोड बोलून आपला स्वार्थ साधणाऱ्या संधीसाधू लोकांसाठी तर वर्षभर संक्रांतच असते. परंतु "ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाल्ला जात नाही " याचेही भान त्यांनी ठेवायला हवे. कारण एक ना एक दिवस पितळ उघडे पडल्यास तात्पुरत्या गोडव्याच्या जागी कायमचा कडवटपणा यायला वेळ लागत नाही. माणसाने आता आपली नैतिकता बदलायला हवी.  आपली मानसिकता बदलायला हवी. प्रत्येक गोष्टींत स्वार्थ शोधण्यापेक्षा कधीतरी जीवनाचा अर्थही शोधायला हवा. औपचारिक आनंद वाटण्यापेक्षा दिलखुलासपणे आपलेपणाची भावना आपल्या कृतीतून व्यक्त व्हायला हवी. 
गोडवा मुखाच्या दारात असण्यापेक्षा माणसाच्या उरात असण्याला जास्त महत्व आहे. आजही समाजात इतरांच्या सुखात आनंद वाटणारी माणसे शिल्लक आहेत म्हणून माणुसकीचा स्नेह अबाधित आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने 
जुनी नाती समृद्ध करून, तुटलेली नाती आवर्जून पूर्ववत करण्याचा संकल्प यावर्षी करूया. मकर संक्रांतीला सूर्य आपली जागा बदलत असतो परंतु आपल्याला मात्र यादिनी इतरांना आपल्या हृदयात जागा द्यायची असते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. आपल्याला मात्र नात्यांचा स्नेह जपत इतरांच्या हृदयात आदराने प्रवेश करायचा आहे.  
 ज्याप्रमाणे उद्यापासून दिवस मोठा आणि रात्र लहान होत जाते. त्याचप्रमाणे आपल्यातील जिव्हाळा दिवसाप्रमाणे वाढत जावा आणि कटुता रात्रीप्रमाणे लहान होत जायला हवी. आकाशात उंच भरारी घेणाऱ्या प्रगतीच्या पतंगाचा धागा आपल्याला माणसे जोडून मजबूत करायचा आहे. 
या मकर संक्रांतीला थोडा वेगळा विचार करूया. ओठांतील गोडवा पोटासाठी (स्वार्थासाठी) न आणता अंतरीचा स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी आणूया. चला तर मग 
नात्यांतील स्नेह आणि जिव्हाळा वृद्धिंगत करण्यासाठी दिल से कुछ मीठा हो जाये."  तुम्हा सर्वाना मकर संक्रांतीच्या स्नेहपूर्वक शुभेच्छा. तिळगुळ घ्या गोड गोड बोला 

Saturday, 6 January 2018 0 comments

पुढे पुढे चालावे

पुढे पुढे चालावे 

Monday, 1 January 2018 0 comments

रंग नवा, संकल्प हवा'

*'रंग नवा, संकल्प हवा'*

*नव्या वर्षाच्या स्वागता,नवे सूर नवी गाणी*
*नव्या हर्षाच्या सोबती,जुन्या स्मरू आठवणी*

पाहता पाहता आज या वर्षाचा पहिला नवा कोरा  दिवसही आला. नेहमीप्रमाणे सर्वांच्या ओठांवर शब्द तरळू लागले की "मागील वर्ष कसे भराभर सरले कळलेही नाही". जुन्या वर्षाने दिलेल्या आठवणी आजही मनाच्या कोपऱ्यात तशाच साठून राहिल्या आहेत. परंतु याचबरोबर प्रत्येकाच्या मनाला नव्या वर्षाच्या नव्या औत्सुक्याची ओढ लागली आहे. 

*छोडो कल की बाते, कल की बात पुरानी*
*नए दौर में लिखेंगे, मिल कर नई कहानी*

असेच काहीसे प्रत्येकाच्या मनमंदिरी गुंजत आहे. एव्हाना नवे वर्ष सुरू झाले आहे. आजची रात्र अनेकांसाठी रंगबिरंगी,मद्यधुंद आणि पार्टीची असणार आहे. तर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी काही ध्येयवेडे नव्या संकल्पांच्या शुभारंभासाठी सज्ज झालेले आहेत. कारण आज आखलेले छोटे छोटे संकल्प उद्याच्या भव्यदिव्य यशाची नांदी ठरणार असतात. *ठरवलेले संकल्प कधी तडीस जातात तर कधी मोडीस येतात.*  परंतु नव्या उमेदीने नव्या संकल्पांची आखणी करणे यात अधिक महत्वाचे. पुलं नी म्हटल्याप्रमाणे , *"कुणाचा गणपती दीड दिवसाचा,तर कुणाचा दहा दिवसांचा असतो, तीच गोष्ट संकल्पाची."*

संकल्प कृतीत नेण्यापेक्षा त्या संकल्पाची आखणी करण्यात मिळणारा आनंद जरा निराळाच असतो.
असो नव्या  वर्षी म्हणजेच आजच्या  दिवशी आपल्या जीवनाच्या समृद्धतेसाठी काही संकल्प नक्कीच करायला हवेत.  सकाळी लवकर उठणे, डायरी लिहिणे, व्यसन सोडणे ,वजन कमी करणे, नियमित व्यायाम /योगा करणे असे दरवर्षी हमखास आखल्या जाणाऱ्या तात्पुरत्या संकल्पासोबतच यंदा जरा वेगळा विचार करूया. आपल्या व्यक्तिमत्वाला नवी झालर देणारे काही संकल्प आखूया. 

*१. आनंदी राहूया:*
 येत्या वर्षात आपण दुःख,राग,तणाव,चिडचिड आणि वादविवाद यांना सुट्टी देऊन नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करूया. कारण आपल्या चेहऱ्यावरील हास्य स्वतःला आणि इतरांना एक विलक्षण समाधान देऊन जाईल. हसतमुख आणि आनंदी चेहरा आपल्या व्यक्तिमत्वाला खुलविण्यासाठी महत्वाचा असतो.
*२. स्वतःला वेळ देऊया:*
आजच्या धावपळीच्या युगात जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाची चढाओढ लागलेली असते. हे सर्व करताना आपण काम,कर्तव्ये,जबाबदाऱ्या यामध्ये इतके गुरफटून जातो की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळही मिळत नाही. नव्या वर्षात आपल्याला साऱ्या गोष्टी सांभाळून प्राधान्याने स्वतःसाठी आवर्जून वेळ द्यायचा आहे. घड्याळाच्या काट्यांमागे धावण्यापेक्षा ज्या गोष्टींतून आपल्याला नंद मिळतो अशा गोष्टी, छंद, आकांक्षा यासाठी वेळ देऊया. 
*३. सकारात्मक विचार करूया:*
 नव्या वर्षी नकारात्मक विचारांना बगल देऊन सकारात्मक विचारसरणी मनी बाळगण्याचा संकल्प करूया. प्रतिकूल परिस्थितीत भावनांच्या पुरात वाहत जाण्यापेक्षा सकारात्मक राहून नव्या वाटा निर्माण करण्याचा आत्मविश्वास आपल्यात यायला हवा. आपल्याला  नव्या वर्षात जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करायलाच हवा.
*४. ध्येय प्राप्तीचा ध्यास घेऊया:*
 ध्येयाविना  जीवनाला काहीही अर्थ नाही. आणि म्हणूनच नव्या वर्षात नव्या यशासाठी नव्या जोमाने नवे ध्येय साकारण्यासाठी सज्ज असायला हवे. त्यासाठी योग्य नियोजन, उद्दिष्टांची आखणी, मेहनतीची तयारी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती इत्यादी गोष्टींबाबत विचार सुस्पष्ट असायला हवा. 

*५. देण्याची भावना ठेऊया:*
जेव्हा आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल तेव्हा आपल्यातील दानशूरपणा सामाजिक कार्यासाठी नक्कीच उपयोगात आणावा. समाजातील दुर्बल,असहाय आणि निराधारांना आर्थिक व मानसिक आधार देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याइतके समाधान इतर कशातही नाही. 
देण्याची भावना वाढली की येण्याचा मार्ग मोकळा होत असतो. 

चला तर मग आजच्या नव्या वर्षाच्या नव्या संकल्पांना नव्या उत्साहाने हाती घेऊया. 
*नव्या वर्षाच्या स्वागता ,करू ध्येयाची खोचनी*
*नव्या उमेदीने करू, नव्या यशाची वेचणी.*

*तुम्हाला व तुमच्या कुटूंबीयांना नववर्ष सुखाचे,समृद्धिचे,आरोग्यमय जावो,नविन वर्षाच्या मनपुर्वक शुभेच्छा.* 💐💐💐💐👍🏼

लेखक: सागर ननावरे ©
प्रसिध्दी  : दैनिक प्रभात रविवार 31 डिसेंबर 2017
sagarnanaware.blogspot.com

 
;