Monday, 29 May 2017 0 comments
चला आयपीएल जिंकू या...!

नुकताच आयपीएल (इंडियन प्रीमिअर लीग) चा थरार मुंबई आणि पुणे संघात झालेल्या अंतिम सामन्याने संपन्न झाला. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात या दीड पावणेदोन महिन्यांत क्रिकेटप्रेमींना मात्र अनेक थरारक लढतींची मनोरंजक जणू मेजवानीच मिळाली. आपल्या आवडत्या संघासाठी आणि खेळाडूंसाठी प्रत्येकाने आपल्या मनात एक खास जागाच करून ठेवली होती. या आयपीएल चा थरार काहींनी प्रत्यक्ष मैदानांत जाऊन अनुभवला तर अनेकांनी टीव्हीवरून याचा आनंद घेतला.
खरं तर अंतिम सामन्याच्या थरारानंतर सोशल मीडियावर पुणेकर आणि मुंबईकर फॅन्सने एकमेकांना धारेवर धरून हि आयपीएल जणू प्रतिष्ठेचीच करून टाकली होती. दोन्ही शहरातले क्रीडाप्रेमी एकमेकांवर तोंडसुख घ्यायची एकही संधी सोडत नव्हते. आणि यात या दोन्ही शहराबाहेरचे मात्र पुणे असो व मुंबई "कप" तर महाराष्ट्रातच येणार असे म्हणून स्वतःच्या मनाची समजूत घालत होते.
या साऱ्या मैदानाबाहेरच्या तुफानी फटकेबाजीने मला लोकांची क्रिकेट आणि आयपीएल बद्दलची कमालीची तळमळ पाहायला मिळाली. आणि मग मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले की जर मनोरंजनासाठी किंवा आपल्या विभागाच्या समर्थनासाठी आपण आपल्यात इतका उत्साह आणू शकतो. जर हाच उत्साह आपण आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी किंवा स्वतःसाठी वापरात आणला तर याने आपला किती मोठा फायदा होईल?
आयपील आपण सर्वांनी एन्जॉय केलीच पण आता मैदानापलीकडची आणि आयुष्याच्या जवळची आयपीएल आपल्याला जिंकायची आहे.
 ही IPL म्हणजेच
आय (I) - मी ( स्वतःसाठी वेळ देणे)
पी (P) - पॅरेंट्स ( स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ देणे )
एल (L) - लाईफ (लार्जर दॅन लाईफ जगणे)
ही आय पी एल आपल्याला एखादा कप नाही जिंकून देणार पण ही आयपीएल आपल्यातील आत्मविश्वासाला मात्र नक्कीच "वेकअप" करेल.
पहिल्या आय मध्ये आपण आपल्या स्वतः साठी वेळ देणे अत्यंत गरजेचे आहे. कामाचा व्याप,तणाव,जबाबदाऱ्यांचे ओझे अशा एक ना अनेक गोष्टीची पूर्तता करण्याच्या नादाद आपण आपल्या स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करीत असतो. परिणामी अशक्त मानसिकता,ताणतणाव,मधुमेह,उच्च रक्तदाब,व्यसनाधीनता आणि इतर अनेक विकार आपल्याला जडत असतात. म्हणूनच आपल्याला
स्वतःसाठी वेळात वेळ काढून व्यायाम,वाचन,छंद जोपासणे आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या गोष्टींना आपण प्राधान्य द्यायला हवे. कारण आपला स्वविकास हाच उद्या आपल्याला यशाच्या शिखरावर नेणारा असतो.
यातील दुसरा पी पॅरेंट्सचा म्हणजेच यात आपले कुटुंबीय,आप्तस्वकीय,गुरुजनवर्ग आणि आपले हितचिंतक यांना वेळ देणे आणि त्यांचा आदर करणे. आजच्या धावपळीच्या जगण्यात आपण सर्वजण इतके पैशाच्या मागे धावतो की पैसे मिळतो पण सुख मिळत नाही. आणि हेच सुख मिळण्यासाठी आपण नेहमी आपल्या पॅरेंट्सला वेळ दिला पाहिजे. लवकर घरी जाणे,कुटुंबियांसोबत वेळ घालविणेत्यांना घेऊन फिरायला जाणे हे व्हायला हवे . त्याचप्रमाणे आपल्या आप्तस्वकीयांच्या आवर्जून भेटीगाठी घेणे त्यांची विचारपूस करणे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे याकडेही आपले लक्ष हवे. त्याचबबरोबर आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे गुरुजनज्येष्ठथोर यांच्या सान्निध्यात वेळ घालवून त्यांच्याकडून नेहमी प्रेरणा घेतली पाहिजे.
  यातले शेवटचे अक्षर म्हणजे एल लार्जेर दॅन लाईफ चा म्हणजेच आपल्याला मिळालेल्या   आयुष्यापेक्षाही मोठी अचिव्हमेंट साध्य करणे. थोडक्यात काय तर आपली प्रगती इतकी उच्च असावी कि पुढील अनेक पिढ्यांत आपल्या प्रगतीची चर्चा व्हावी. आपल्या असामान्य कर्तृत्वाने आपला आदर्श नेहमी घेतला जावा अशी प्रतिमा आपल्याला तयार करता आली पाहिजे. आणि अशी लार्जर दॅन लाईफ जगण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यात ध्येय ठरवावी लागतील आणि त्या ध्येयप्राप्तीसाठी आपल्याला स्वतःला वाहून घ्यावे लागेल. यासठी ठासून भरलेला आत्मविश्वासअनोखी जिद्दमेहनतीची तयारी आणि ध्येयाप्रती कमालीची एकाग्रता आपल्याला आपल्या नसानसात भरावी लागेल. एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून उदयास येण्यासाठी ज्या ज्या कौशल्यांची आणि क्षमतांची गरज असते अशा सर्व गोष्टी आपल्याला आपल्या अंगी बाणवाव्या लागतील.
मित्रांनो आयपील ची धामधूम संपली आहे आणि हीच योग्य वेळ आहे आपल्या आयुष्याच्या आयपीएल वर लक्ष केंद्रित करण्याची. आपले ध्येय त्या उंची षटकारासारखे हवेआपल्या प्रत्येक उद्दिष्टाचा चौकार सीमेपार जायला हवावेगाने येणाऱ्या प्रत्येक संकटांचा सामना करून त्यांना टोलविण्याची ताकद आपल्याकडे हवी.
आपले प्रत्येक पाऊल योग्य हवेआपल्या लक्ष्याच्या दिशेने आपली डिलिव्हरी पाहिजेयेणाऱ्या प्रत्येक संधीला आपल्याला झेलता आले पाहिजे आणि आपल्या प्रत्येक उद्दिष्टाचे (ओव्हर) चे आपल्याकडे नियोजन असायला हवे. मग बघा क्रिकेटची आयपील कोणीही जिंकू पण आपल्या आयुष्याच्या आयपीएलचे विजेते नेहमी तुम्हीच असणार. चला तर मग आयपीएल पाहू या सेटमॅक्स ची नाही "गोलसेट'' ची !

लेखक
सागर नवनाथ ननावरे
Monday, 22 May 2017 0 comments

कारण विनाकारण

                                               कारण  विनाकारण ?

"कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधीही कारण सांगत नाहीत." वरवर ऐकायला छान वाटणाऱ्या या गोष्टी आपल्याला यशाचा एक अनोखा मूलमंत्रच देऊन जातात.
शालेय जीवनात आपल्याला परीक्षेत एक प्रश्न विचारला जातो आणि कारण द्या म्हणून उत्तर लिहावयास सांगितले जाते. उदा. विजेचा प्रकाश आधी दिसतो मात्र आवाज नंतर ऐकू येतो  मग आपण उत्तर लिहितो कारण कि, प्रकाशाचा वेग ध्वनीपेक्षा जास्त असतो. आणि आपल्याला त्या उत्तराबद्दल पैकीच्या पैकी गुणही मिळतात.
शालेय पाठयक्रमाप्रमाणे ही कारणे ज्ञानवृद्धीसाठी नक्कीच उपयुक्त ठरतात. परंतु आपण जसजसे मोठे होऊ लागतो तसतसे आयुष्यातल्या या ना गोष्टींना सतत कारण देण्याची आपल्याला सवय जडलेली असते. आणि आपण त्यात इतके पारंगत होऊन जातो की आपल्या सोयीप्रमाणे आपण कारणे देऊन टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतो.  ही कारणे वास्तव परिस्थितीनुसार वापरण्यात काहीही गैर नाही. परंतु  जेंव्हा आत्मविश्वास खालावला जातो किंवा स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल साशंकता निर्माण होते अशावेळी कारणे देऊन चालढकल करणे अयोग्य ठरते.
माझा असाच एक जुना मित्र एका खासगी कंपनीत कामाला होता. त्या कंपनीत तो एका चांगल्या वरिष्ठ पदावर काम करीत होता. त्याच्याबरोबरच एक श्याम नावाचा एक अत्यंत होतकरू आणि चाणाक्ष मुलगा त्याच्या हाताखाली कामास होता. त्या कंपनीत बरेचदा सुट्टीच्या दिवशी विविध  स्टाफसाठी प्रशिक्षणक्रम राबविले जात असत. त्या प्रशिक्षणक्रमांत व्यक्तिमत्व विकास, सादरीकरणाचे कौशल्य आणि उत्कृष्ठ व्यवस्थापनाबाबत धडे दिले जात असत. परंतु माझा मित्र मात्र नेहमी काहीना काही कारणे देऊन त्या प्रशिक्षणक्रमांस गैरहजर राहत असे. 
सात आठ महिने उलटून गेल्यावर तो मित्र एके दिवशी माझ्याकडे आला आणि हताशपणे सांगू लागला की," यार तो माझ्या हाताखाली काम करणारा श्याम आता माझा बॉस झालाय." मी त्याला याचे कारण विचारलॆ असता त्याने सविस्तर सांगितले,'यार सुट्टीच्या दिवशी कोण काम करतं का ? तो श्याम जास्त हुशारपणाने ते करायचा आणि त्यामुळे कामातही त्याने जास्त शहाणपण दाखवायला सुरुवात केली आणि मग केलं त्याला बॉस."
खरं तर या चर्चेनंतर माझ्या लक्षात आलं कि मुळात त्या श्यामची यात काहीही चूक नव्हती. माझा मित्रच यात कमी पडला होता या ना त्या कारणाने सतत गैरहजर राहून जबाबदारी झटकल्यामुळे त्याच्यावर हि वेळ आली होती. तर श्यामने मात्र भविष्यातील ध्येय निश्चित करून कोणतेही कारण न देता जबाबदाऱ्या उमेदीने पार पडल्यामुळे त्याला बढती मिळाली होती. पण आता काहीही होणार नव्हते श्याम आता थांबणार नव्हता यशाची शिखरे तो उत्तरोत्तर काबीज करणार होता कारण त्याला विनाकारण "कारणे" देण्यात रस नव्हता.
मित्रांनो आपणही बरेचदा आपण आपल्या मर्जीप्रमाणे वागून समोर आलेल्या संधींना बगल देत असतो . परिणामी हीच कारणे आपल्या यशाच्या रस्त्यावर काटे बनून आपल्या ध्येयामध्ये अडथळे आणत असतात. आयुष्यात बरेचदा चुकीच्या अथवा अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यासाठी कारणे देणे कदाचित उचित ठरू शकते. परंतु केवळ आपल्या सोयीनुसार व आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याच्या प्रयत्नात जर आपण करणे देत असू तर मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. आपल्या आयुष्यात विनाकारण येणारी कारणे ही आपल्या अनेक संधी आणि प्रगतीला लगाम लावण्याचा प्रयत्न  करीत असतात.
चला तर मग विनाकारण कारणे देण्यापेक्षा अनावश्यक कारणांना पूर्णविराम देऊया कदाचित यामुळे काहीतरी सकारात्मक आयुष्यात घडेल.
0 comments

चला वाचू या...!


“करू ग्रंथ व पुस्तकांचे वाचन..वैचारिक संपत्तीचे होईल जतन’’ प्रबोधनकारांच्या या ओळी वैचारिक श्रीमंतीचं रहस्य अतिशय समर्पकपणे स्पष्ट करतात.  
 
एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद एका पुस्तकात असते. परंतु आज बदलत्या जमान्यात वाचन संस्कार मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. पुस्तकांची जागा टॅब आणि  मोबाईलने घेतल्यामुळे वाचनासाठी कुणालाच वेळ नसल्याचे चित्र सर्रास दिसून येत आहे. भावी  पिढ्यांना वाचनातून ज्ञानप्राप्ती व्हावी व समाजपरिवर्तन घडावे यासाठी अगदी पूर्वीपासून संत, महंत आणि साहित्यिकांनी ग्रंथ,अभंग,ओव्या आणि इतर साहित्य निर्माण केले. पुढे अनेक पिढ्यांनी त्याचे पालन विविध माध्यमांतून करून ज्ञानाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनही केले. परंतु "शाळा सोडल्यानंतर वाचन आणि आमचा सहसा संबंध आला नाही" असे सांगून आपण त्याकडे  अगदी सहज दुर्लक्ष करतो.  शालेय जीवनापासूनच वाचनाची गोडी निर्माण करणारे उपक्रम राबवले जातात परंतु ते दीर्घकाळपर्यंत न टिकल्याने ऐन उमेदीच्या काळात अपयशाचा सामना बऱ्याचदा करावा लागतो.
भाषेच्या आणि स्वतःच्या उत्कर्षासाठी वाचन ही काळाची गरज आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 
आजकाल शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच अगदी मोठ्यांनाही वाचनदोषाचे प्रमाण अतिशय मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे. परंतु ही ज्ञानवृद्धीची वाचन चळवळ या मोबाईलच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगातही चालूच राहावी यासाठी प्रत्येकाने आपणहून पुढाकार घेतला पाहिजे. शाळेत शिक्षकांनी सुद्धा केवळ तोंडीपरीक्षेच्या निकषाने पास  नापास ठरविल्याने विद्यार्थ्यांत न्यूनगंडाची भावना निर्माण होऊन वाचन दोषाच्या समस्या वाढतच जातात. परंतु ध्येयवादी ब्रिटिश शिक्षिका रेमीदियाना डायस ज्यांनी वाचन चळवळीसाठी स्वतःला झोकून घेतले आहे यांचा आदर्श आपण घ्यायला हवा. त्यांनी वास्तववादी अनुभवातून साकारलेल्या ‘अंडरस्टँडिंग डिसलॅक्शिया' पुस्तकातुन वाचनाबद्दल व वाचनदोषांबद्दल सविस्तरपणे स्पष्टीकरण दिलेले आहे.   
मला आजही आठवत मी दुसरी तिसरीत असताना आमच्या घरी दोन तीन वर्तमानपत्र यायची. आई-वडील ते नियमितपणे वाचत असायचे. परंतु आम्ही बहीण भावंडे मात्र रद्दी साचून खाऊसाठी दोन-पाच रुपये मिळण्याच्या आशेवर असायचो.  आईवडिलांनी खूपदा समजावून सांगितले परंतु मी कधीच गांभीर्याने घेतले नाही. यावर वडिलांनी कोणतीही जबरदस्ती न करता एक शक्कल लढविली. क्रिकेट हा विषय लहानपणापासूनच आवडीचा असल्याने त्यांनी वर्तमानपत्र वाचता वाचता माझ्याशी मुद्दाम क्रिकेटच्या सामन्याबद्दल चर्चा करायला सुरुवात केली. अनेकदा ते मला त्यासंबंधी प्रश्न विचारायचे परंतु मला उत्तर देता येत नसे. अशावेळी ते सर्वांसमोर मला खोचकपणे उद्देशून बोलायचे" याला काय माहित असणार हा फक्त मॅच पाहतो, त्याबद्दल वाचतो थोडीच?". आणि यामुळे  कुठेतरी माझा इगो दुखावला गेला आणि मी जाणीवपूर्वक शेवटच्या पानावरील क्रीडा वृत्तांत नियमितपणे वाचू लागलो. पुढे चंपक,चांदोबा,इसापनीतीच्या गोष्टी वाचण्यासाठी दर महिन्याला पुस्तक खरेदीसाठी वडिलांकडे हट्ट करू लागलो. बालपणीच्या त्या वाचनामुळे पुढे मी एक सकारात्मक आणि साहित्यिक व्यक्तिमत्व म्हणून हळू हळू घडू लागलो.
 तंत्रज्ञानामुळे आजचे युग हे डिजिटल युग म्हणून उदयास येत आहे. परंतु हे केवळ डिजिटल युग नसून  हे ‘ज्ञानयुग’ आहे. जो ज्ञानी असेल तोच या युगात अपेक्षित इप्सित साध्य करू शकेल. व्यवहार ,व्यवसाय,शेती,राजकारण, संरक्षण आणि इतर अनेक क्षेत्रांतील ज्ञान हे अतिशय वेगाने वाढते आहे.   
आधुनिक जगात यशस्वी जगण्याची कला आत्मसात करण्यासाठी वाचन कौशल्य अतिशय गरजेचे ठरणार आहे.   जर वाचन कौशल्य प्राप्त केले नाही तर आज आपण डिजिटल युगातही आउटडेटेड ठरणार आहोत.  
वाचाल तर वाचाल या म्हणींचे महत्व आज आपणा प्रत्येकास समजणे अतिशय महत्वाचे आहे. शालेय जीवनातील पाठ्यपुस्तके आपल्यात बदल घडवितात तर अवांतर वाचनाची पुस्तके आपले व्यक्तिमत्व घडवीत असतात. आजच्या इको फ्रेंडली जमान्यात ईबुक,ऑडिओ बुक,पीडीफ च्या माध्यमातून आपण एकाचवेळी हजारो पुस्तके आपल्या मोबाईलमध्ये जतन  करून ठेवू शकतो. वाचनाची सवय जडल्यावर काय वाचावे आणि कसे वाचावे हेही आपल्याला आपोआपच अवगत होत जाते. देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा
Saturday, 6 May 2017 0 comments

मैदानात या

मैदानात या...! प्रत्येक मुलाने व त्याच्या पालकाने आवर्जून वाचावा असा लेख

गेल्या आठवड्यात माझ्या एका मित्राच्या घरी वाढदिवसासाठी गेलो होतो. वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा होत होता. पाच सहा वर्षांचा त्याचा मुलगा निल केक कापण्यासाठी छान छान कपडे घालून हॉलमध्ये आला. अंगकाठीने अगदी तिडतिडित, डोळ्याला चष्म्याचे कवच आणि कपाळावर दोरीएवढ्या आठ्या असे त्याचे व्यक्तिमत्व. केक कापण्याची वेळ आली त्याने मेणबत्त्या फुंकल्या आणि केक कापण्यास सुरुवात केली आणि तेवढ्यात बाकीच्या चिमुकल्यांनी फुगे फोडण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने त्याच्या डोक्याच्या वर बांधलेल्या फुग्याला अगरबत्ती लावली आणि जोराचा फटाक असा आवाज झाला. आणि तो आवाज होताच बर्थडे बॉय निल मात्र जोरात दचकला आणि त्याच्या आईला बिलगून रडू लागला.
 मी माझ्या मित्राला म्हणालो , 'अरे याला जरा धीट बनव".
तसा तो बोलला, ' तो थोडा घाबरतो परंतु खूप हुशार आहे त्याला मोबाईल मधले काहीही विचार तो पटक्यात सांगतो, आणि गेम्समध्ये तर त्याचा कुणी हातच धरू शकत नाही"
मो मोठ्या कुतूहलाने विचारले," काय सांगतो कोणत्या गेम्स ?
मी कबड्डी,खो-खो,क्रिकेट किंवा फुटबॉल या खेळांच्या उत्तराची अपेक्षा करीत होतो पण त्याचे उत्तर ऐकून मलाही धक्का बसला.
तो बोलला, " कँडी क्रश, सुपर मारियो,अँग्री बर्ड, तीन पत्ती आणि बरेच मोबाईल गेम्स.
आता मात्र मला त्याच्या त्या तिडतिडित आणि चष्मेबहाद्दर व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचा उलघडा चांगलाच झाला होता. मी त्यानंतर त्याला बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या त्यातील त्याला कितपत पटल्या देवजाणे.
खरं तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे मुलांसाठीच आनंदाचा आणि धमाल करण्याचा सोहळा असतो. परंतु पालकांसाठी या सुट्ट्यांत आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव देण्याची ही एक सुवर्णसंधी असते. पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाण्यासाठी बालचमूंची लगबग असायची परंतु आता मोबाईलमधील व्हिलेज गेम्सने ती सारी धमालच घालवली आहे. मोबाईल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात मैदानी खेळांचे महत्व दिवसेंदिवस लोप पावत चालले आहे. लगोरी,सूर पारंब्या,क्रिकेट,भवरा, कंचे असे देशी खेळ आज बऱ्याच प्रमाणात फक्त पुस्तकातील आठवणी बनल्या आहेत. पोहणे,धडपडत सायकल शिकणे,धावण्याची स्पर्धा,गच्चीवरचा पत्त्यांचा डाव,आणि रात्री बिछाने पसरून चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत झोपी जाणे या बालपणीच्या सुखाला आजची पिढी पारखी झाली आहे.
दिवसभर छोटा भीम, डॉरेमोन, आणि सुपरहिरोजचे कार्टून पाहण्यात मग्न झालेली मुले कार्टून सारखीच दिसू आणि वागू लागली आहेत. मैदानी खेळांचा विसर पडत चालल्याने सशस्क्त आणि सुदृढ मुलांची जागा घरकोंबडी वृत्तीच्या भित्र्या आणि अशक्त मुलांनी घेतली आहे.
पालकांनी आता वेळीच जागे होण्याची गरज आहे मुलगा मोबाईलमधला मास्टर आहे हे कुतूहलाने सांगण्यापेक्षा त्याला मैदानात आणून त्याच्यातील क्षमतांची त्याला जाणीव करून दिली पाहिजे. तंत्रज्ञानाची आवड आणि ज्ञान नक्कीच हवे परंतु याचे रूपांतर तंत्रज्ञानाच्या व्यसनात व्हायला नको याची काळजीही घेतली गेली पाहिजे.
संत तुकाराम महाराज सांगतात की "पुत्र व्हावा ऐसा गुंडा। ज्याचा तिन्ही लोकीं झेंडा॥" म्हणजेच आपल्या मुलाच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्याची कीर्ती सर्वदूर व्हायला हवी. ही उन्हाळ्याची सुट्टी एक चांगली संधी आहे मुलांना मैदानात आणा शारीरिकदृष्ट्या चपळ आणि सुदृढ बनवा. त्यांच्यातील लठ्ठपणा,अशक्तपणा,एकलकोंडीपणा,हट्टीपणा आणि सुस्तपणा जर आपल्याला पळवून लावायचा असेल तर त्यांना मैदानी खेळांचे प्रशिक्षण द्यायलाच हवे. मैदानी खेळांतून अभ्यासाचा ताण दूर होईल.
मुलांमध्ये संघभावना वाढीस लागेल, नेतृत्वगुणांचा विकास होईल, खिलाडूवृत्ती,कल्पकता,लवचिकता या गुणांसोबतच त्यांचा सर्वांगीण विकासही घडून येईल.
चला तर मग बच्चे कंपनी आता मैदानात या , " आ देखे जरा किसमे कितना है दम?"
 
;